श्री नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय यांचा पवित्र संगम (महायोगी गुरु गोरक्षनाथ यात्रा 32 शिराळा)

भारताच्या हिमालयापासून ते रामेश्वपर्यंत या संपूर्ण भारत वर्षांवर प्रभाव टाकणारा संप्रदाय म्हणजेच नाथ संप्रदाय सर्व जाती-जमातीच्या लोकांना सामावून घेऊन स्त्री शुद्रांचा हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करणारा संप्रदाय आहे हा शैव सांप्रदाय मानला जातो आणि वैष्णव म्हणजे वारकरी संप्रदाय एक धार्मिक सांस्कृतिक परंपरा जी विठ्ठल भक्तीत व नामस्मरणात आहे या दोन्ही परंपरांचा पवित्र संगम म्हणजे 32 शिराळ्याची गोरखनाथ यात्रा की ज्या यात्रेला हजारो वर्षाची परंपरा आहे चैत्र महिन्याच्या वरुथिनी एकादशीला ही यात्रा भरते यावेळी एक पवित्र अध्यात्मिक वातावरण निर्माण होते.


नाथ संप्रदायात आदिनाथ शिवशंकर यांना मानले जाते त्यानंतर बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली आणि त्यांचे प्रथम शिष्य म्हणजे गुरु महायोगी गुरु गोरखनाथ होय यानंतर प्रमुख नवनाथ व 84 सिद्ध पुरुषांची नामावली येते गुरु गोरखनाथ यांनी भारतात विविध ठिकाणी तपस्या केली शिराळा येथील तोरणा व मोरणा संगमावर बारा वर्षे तपश्चर्या करून आपली कायमची अधिवासाची भूमी निर्माण केली याविषयी अनेक कथा सापडतात त्यानंतर त्यांनी नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार केला त्याच्या पाऊलखुणा भारतभर तसेच परदेशात ही सापडतात नाथ हे शिवजती चिरंजीवी मानले जातात त्यांचा वास आजही शिराळा या ठिकाणी असल्याचे आपणास जाणवते.


गुरु गोरक्षनाथ ग्रंथसंपदा – गुरु गोरक्षनाथ रचित असंख्य ग्रंथ आहेत अमनस्कयोग,अमरोगघप्रबोध, गोरक्षपद्धती ,गोरक्ष संहिता, सिद्धसिद्धांतपद्धती, योग मार्तंड, असे असंख्य ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत आहेत त्यापैकी बऱ्याच ग्रंथांचे या लिखाण परिसरामध्ये केल्याचे संदर्भ सापडतात गुरु महायोगी गोरक्षनाथांनी संपूर्ण मानव जातीला दिलेले योगदान म्हणजे योग होय ते अध्यात्मातील एक प्रभावी शक्ती होते काही ग्रंथांमध्ये गोरखनाथ यांनी चारही युगात अवतार घेतल्याचे उल्लेख आहेत त्यांनी योगसामर्थ्याने भारताच्या अध्यात्माचे शुद्धीकरण केले गोरखनाथांनी योग साधना कर्मयोग, भक्तीयोग याद्वारे आत्मसाधना मनोविकास यांना महत्त्व देऊन धर्मभेद वर्णभेद जातिभेद न करता भारतीय धर्म साधनेची बैठक निर्माण केली
गुरु गोरक्षनाथ यांना संत ज्ञानेश्वर’योगाबजनीसरोवर’तसेच ‘विषयविध्वंसकवीर’असेही ही संबोधले आहे ते कधीही मोहजालात फसले नाहीत त्यांच्यामध्ये एकूण असणारे पुरुषाचे 32 लक्षणे होती.


वारकरी संप्रदाय हा वैष्णव सांप्रदाय म्हणून मानला जातो तो विठ्ठलाच्या भक्तीत रममाण होणारा चिंतनशील भक्ती चळवळीचा असणारा समाजरूप सांप्रदाय होय याही ठिकाणी सर्व जाती पंथातील लोकांना स्थान आहे ज्ञानेश्वर ,ज्ञानदेव, मुक्ताई चोखामेळा ,सावता माळी, गोरोबा कुंभार अशा विविध जाती धर्मातील संतांची परंपरा यास लाभली आहे वारकरी संप्रदायाने शैव वैष्णव परंपरेवर वर भर दिला.
संत ज्ञानेश्वर गुरुपरंपरेने नाथपंथीय होते त्यांच्या विचारसरणीचा ठसा या सांप्रदायावर आहे नऊ नाथांपैकी गहिनीनाथ यांचे शिष्य असणारे निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु बंधू होय.


आदिनाथशंकर-मच्छिंद्रनाथ -गोरक्षनाथ_गहिनीनाथ-निवृत्तीनाथ- ज्ञानेश्वर अशी गुरुप परंपरा मानली जाते म्हणूनच म्हटले जाते

आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला।
गोरक्ष वोळला गहिणीप्रती।।
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार।
ज्ञानदेवा सार चोजविले।।

या गुरुपरंपरेतूनच नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा पवित्र संगम झाला या दोन्ही संप्रदायांनी एकत्रित येऊन व्रतवैकल्य यांचे स्तोम न ठेवता अद्वैत भक्ती ज्ञान उपासना विवेक व एकात्मतेवर भर दिला आणि बहुजन समाजात नवचैतन्य आणले नाम कीर्तनाचा साधा सोपा मार्ग समाजापुढे ठेवला वारकरी संप्रदायाने कधीही अध्यात्माचे अवडंबर माजविले नाही कीर्तन अभंग गवळणी ओव्या भारुडे या सुलभ मार्गांचा वापर केला व स्त्री- शुद्रांना अध्यात्मात स्थान दिले आणि भक्तिमार्गाची चळवळ निर्माण केली.


आज वरुथिनी एकादशी गावोगावच्या दिंड्या गोरखनाथ दरबारात येतात चैत्र कृष्ण एकादशीस हा शैव वैष्णवांचा मेळा भरतो या दिवशी शिराळा नगरी टाळ मृदुंगांच्या गजराने दुमदुमून जाते महाराष्ट्राबरोबर कर्नाटकऊनही मोठ्या प्रमाणात दिंड्या या ठिकाणी सामील होतात नाथ मंदिर परिसरात जणू प्रति पंढरपूर यात्रेचा साज चढतो दिंड्या या ठिकाणी राहुट्या करून राहतात ज्या संमावर गुरु गोरक्षनाथांनी अवघड तपस्या केली त्याच संगमावर शैव वैष्णवांचा मेळा भरतो आणि वारकरी नाथ संप्रदायाचा पवित्र संगम होतो आणि गुरु गोरक्षनाथ संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचा जयघोष होतो.


ॲड. प्रा सम्राट विजयसिंह शिंदे
BA Bped MA.MPhil.L.L.B.
संदर्भ
१. नाथ संप्रदायाचा इतिहास रा.ची. ढेरे
२. नाथ संप्रदाय डॉ.मधुकर रामदास जोशी
३. चैतन्य गुरु गोरक्षनाथ जयराज साळगावकर
४. नवनाथ भक्तिसार. धुंडीसुत मालूकवी

By Rohit More

Rohit More is a passionate blogger who writes about the people, culture, and progress of Sangli district.